राजकारणात दादाराव केचे यांची जिल्ह्याला आजही गरज – जनतेच्या प्रतिक्रिया

वर्धा (मंगेश चोरे पाटील)
विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत आला असताना भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार श्री. दादाराव केचे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात यावी, अशी मागणी जनतेतून जोर धरताना दिसत आहे. दादाराव केचे आणि भारतीय जनता पार्टी यांचे नाते हे अनेक वर्षांचे आणि दृढ ऋणानुबंधाचे आहे. ज्या काळात सर्वत्र काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते आणि भाजपचा ठसा फारसा नव्हता, त्या काळात केचे यांनी सायकलवरून गावा-गावांत जाऊन कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आंदोलने, पोलिस केसेस, सभा आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पक्षविस्तारासाठी आयुष्य झोकून दिले.
आर्वी मतदारसंघात भाजपचा झेंडा रोवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परंपरेने काँग्रेसचा गड असलेल्या आर्वी मतदारसंघात भाजपची सत्ता आणण्यातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
विधानसभेसाठी पक्षाने तरुण उमेदवाराला संधी दिली, हा निर्णय जनहिताचा मानला जात असला तरी केचे यांना त्यांच्या अनुभव आणि योगदानाच्या आधारावर विधानपरिषदेवर कायम ठेवावे, अशी भावना आर्वीकरांमध्ये व्यक्त होत आहे.
दादाराव केचे हे आजही पक्षाशी निष्ठावान राहून गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या निवासस्थानी दररोज सकाळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व पुढेही कायम राहावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत.














Leave a Reply