सरकारी धान्य पकडले : लाखो रुपयांचे धान्य जप्त
तांदूळ तस्कर रहीम फरार; मकोका अंतर्गत कारवाईची चर्चा
वर्धा (मंगेश चोरे पाटील):
मागील काही काळापूर्वी पत्रकारांना मारहाण करणाऱ्या तांदूळ तस्करावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. वर्धा येथील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून लाखो रुपयांचे सरकारी धान्य जप्त केले असून मुख्य आरोपी रहीम शेख हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा औद्योगिक वसाहतीत एक गोडाऊन भाड्याने घेऊन रहीम शेख हा ग्रामीण भागातील गरीब नागरिकांकडून कमी किमतीत धान्य खरेदी करून तेच धान्य जास्त दराने विकण्याचा अवैध व्यवसाय करत होता.
या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी त्या गोडाऊनवर छापा टाकला. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात तांदूळ व इतर धान्य साठवलेले आढळून आले. अधिकाऱ्यांनी या धान्याचे बिल मागितले असता “बिल घेऊन येतो” असे सांगून रहीम शेख तेथून फरार झाला.
कारवाईदरम्यान सुमारे 100 क्विंटल तांदूळ आणि 10 क्विंटल गहू असा मोठा साठा जप्त करण्यात आला. हा माल शासनाच्या स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत गरजू नागरिकांना वितरित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुलगाव रस्त्यावरील सालोड परिसरात सुरू असलेल्या याच अवैध धंद्याजवळ काही पत्रकार थांबले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे रहीम शेख हा धान्य तस्करीच्या मोठ्या जाळ्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे.














Leave a Reply