जिल्हाप्रमुख पदाचा गैरफायदा घेऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ठेकेदारी? कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
वर्धा (मंगेश चोरे पाटील) – दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा विसर पडल्याची बाब समोर आल्यानंतर पक्षांतर्गत अनेक मुद्दे पुढे येऊ लागले आहेत. स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप करत संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हाप्रमुख पदाचा गैरफायदा घेत अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करून ठेके मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. काहींनी तर “शिवसेना जिल्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी”प्रमाणे चालवली जात असल्याची टीकाही केली आहे. पदाचा वापर संघटन मजबूत करण्याऐवजी दबावतंत्रासाठी केला जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
याशिवाय, जिल्हास्तरावर स्थानिक समित्यांवरील पदे हस्तगत करण्यात अपयश आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संघटन ढासळत असून नामधारी पदांचे वाटप केल्याचीही चर्चा आहे.
गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या एका निवडणुकीत अंतिम टप्प्यात दुसऱ्या पक्षाशी संधान साधल्यामुळे स्वतःच्या उमेदवाराचा पराभव जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया मात्र अद्याप समोर आलेली नाही.
शिवजयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी जिल्हाप्रमुख अनुपस्थित राहिल्याबद्दलही निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “जिल्ह्यात एकेकाळी शिवसेना अत्यंत सक्रिय होती; मात्र सध्या संघटनात्मक जोम कमी झाल्याचे चित्र दिसते,” अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात येते; मात्र ते केवळ औपचारिक भेट देऊन परत जात असल्याची टीकाही काहींनी केली आहे.
या प्रकरणातील इतर मुद्द्यांवर पुढील भागात सविस्तर…
क्रमशः…














Leave a Reply