वर्धा शहरातील ट्रॅफिक सिग्नल पुन्हा कार्यान्वित: वाहतूक झाली सुरळीत

वर्धा (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय पडलेले वर्धा शहरातील ट्रॅफिक सिग्नल अखेर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक शाखेच्या अथक प्रयत्नांमुळे हे सिग्नल आता योग्य टायमिंगनुसार कार्यरत असून, वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
पूर्वी वर्धा शहरातील सिग्नल हे ‘पांढरा हत्ती’ ठरत होते. अनेक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्यांची चाचणी घेतली, मात्र योग्य ताळमेळ न बसल्याने ते पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकले नव्हते. वर्धा हे ब्रिटिश काळातील जुने शहर असून येथे चौक मोठे आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सिग्नल सिस्टमची रचना व टाइमिंग इतर शहरांपेक्षा वेगळी असल्याने यासाठी अनुभवी तांत्रिक तज्ज्ञांची गरज होती.
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. विलास पाटील यांनी या समस्येचा सखोल अभ्यास करून, शहरातील आर्वी नाका, शिवाजी महाराज चौक आणि बजाज चौक येथील सिग्नल पुन्हा कार्यान्वित केले. त्यांनी सिग्नलचे टायमिंग संतुलित ठेवत वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेतली.
सध्या बजाज चौक परिसरातील सिग्नल प्रभावीपणे कार्यरत असून, सिग्नल बंद असताना अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक सुरक्षितपणे पार होते आणि सिग्नल सुरू होताच मुख्य मार्गावरील वाहतूक स्वयंचलितपणे थांबते. यामुळे वाहतुकीतील गोंधळ आणि अपघाताच्या घटना कमी झाल्या आहेत.
ही सुधारणा वर्धा पोलिस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिल्याचेही वृत्त आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने शहरातील सिग्नल व्यवस्थेला नवी दिशा दिली आहे.
सध्या वर्धा पोलिस यंत्रणा अत्यंत कार्यतत्परतेने काम करत असल्याचे जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकारी व कर्मचारी वर्गातील प्रामाणिकता आणि जनसहभागामुळे शहरातील वाहतूक आता अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित बनली आहे.









Leave a Reply